Sunday, April 27, 2008

स्वारी महिकावतीवर, झांझरोळी मार्गे



अस्मादीकांचे पुर्वज बहुदा पापडी, केळवे-माहीम या परीसरातुन फार फार पुर्वी मुंबईस येवुन स्थाईक झाले असावे. आपण दुसऱ्या कोणाचे पुर्वज होण्याच्या आधी हा परीसर पाहुन घ्यावा हा विचार मनी प्रबळ झाला, बरेच वर्षे जावु जावु करत, जाणे लांबबले. आज म्हटले जायचच. फांदी तुटो वा पारंबी. मेरे मुन्नेकी मां. या वाल्या कोळ्याची सहचारणी , त्याच्या या असल्या पापकर्मात नेहमीच आनंदाने सहभागी होणारी.

मग काय कुच केले. विरार वरुन सकाळी ८.३० वाजता सुटणारी शटल पकडुन. केळवे रोड रेल्वे स्थानकावर उतरलो. पुर्वेला एक अप्रतीम स्थळ आहे, पावसाळ्यात तर जन्नतच. झांझरोळी धरण, वरती डोंगरात सुपझरा नामक धबधबा ( फक्त पावसाळ्यात ) , तारुखांड व वरच्या धारमाथावरुन दिसणारा पलीकडचा सूर्या आणि वैतरणा नदयांचा संगम.

आधी विचार केला वर पर्यंत जावुन येण्याचा. पण उन्हाचा तडाखा सहन होईना. रेल्वे स्थानका पासुन आता धरणाकडे जाण्यासाठी चांगली डांबरी सडक झाली आहे, पुर्वी गेलो होतो तेव्हा नव्हती. ऑटोरिक्षा ही उपलब्ध आहेत. पण सध्या फिटनेसचा मौसम असल्या मुळे आम्ही चक्क चार किलोमीटर चालत गेलो. धरण पाहुन मग पश्चिमेला असलेल्या केळवे गावी गेलो.

केळवे, एक नितंत सुंदर , शांत गाव, समुद्रकिनारा प्रेक्षणीय आणि आल्हाददायक असे सुरुचे बन असलेला. नागवेलीच्या पानांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला.

येथे शितळादेवीचे सुंदर, स्वच्छ आणि प्रशस्त मंदीर आहे. देवळासमोर तलाव आहे. आणि हो, दोन चांगली रहाण्याजेवणाची सर्वोत्तम सोय असलेली हॉटेल देखील आहेत.

विसावा मधे रुचकर घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला .चवळीची तोंडाला पाणी सुटायला लावणारी रस्सेदार भाजी बहुदा घोसाळे घालुन केलेली, बटाटा सुकी भाजी, परत परत खावासा वाटणारा, मन व पोट दोघांनाही संतोष देणारा डाळभात व चटकमटक लिंबुचे गोडे लोणचे.

मग सुरुच्या वनातील वामकुक्षी, तबीयत खुश झाली. गावात ऊन व उकाडा मात्र खुप होता. पण समुद्रकिनारी मात्र छान वारे होते.

मग गेलो माहीमला. माहीम म्हणजे प्राचीन काळची महिकावती नगरी. ही बिंब कुलातल्या राजाची राजधानी होती. ( माझे पुर्वज बिंब कुलातले तर नसावे ना ?) बाजारपेठेत हिंडलो, चालत चालत, मजल दरमजल करत येथील समुद्रकिनारी, उन्हाचे चटके सहन करीत, वाटॆत असलेल्या नारळी पोफळीच्या बागा न्याहळत. हा किनारा काही खास नाही हे जाणुन घेण्यासाठी.

आणि हो , कलींगडॆ, शहाळ्याचे पाणी, जाम, व ताडगोळे यांचा दिवसभरात मनमुराद उपभोग घेतला. उन्हात येवढे चालायचे तर टिकाव धरला पाहीजेना.

केळवे ते माहीम रस्ता मस्त आहे.

No comments: