Thursday, August 26, 2010

मेंदी आणि पानगळ.

आज सकाळीच एकीच्या ब्लॉगवर "मेंदी" वरचा छान लेख वाचला , थोड्याच वेळात फेसबुकवर परत "मेंदी".

अरे काय आहे तरी काय ? आज किती वेळा मेंदी दिसणार ?

ही मेंदी फार फसवी हो, फार मायावी. भल्याभल्यांना भुलवणारी, भल्याभल्यांना घायाळ करुन सो्डणारी.

त्याचे असे झाले.

कछुए : इतिजार हुसैन
पुस्तक - मोरनामा आणि इतर कथा
कथा-निवड, प्रस्तावना आणि अनुवाद भास्कर लक्ष्मण भोळे. मधुन साभार.

"आदल्या दिवशी तो पुन्हा त्याच गल्लीत गेला आणि त्याच दरवाजावर त्याने टकटक केली. पुन्हा कोमल पावलांची तीच देवडीवर आली आणि पुन्हा त्याने झुकलेल्या नजरेने भिक्षापात्र पुढे केले आणि तो भिक्षा निघुन गेला. हाच त्याचा नित्यक्रम होता. कितीतरी दिंडी -देवड्यातुन कितीतरी स्त्रियांच्या हातून त्याने भिक्षा घेतली होती पण कधीही नजर वर उचलून कोणाकडॆच पाहिले नव्हते. त्याने हे ओळखले होते की पंचद्रियांपैकी डोळेच जास्त पापी असतात, जे काही दिसते ते मायाजाल असते. ......

तो वसंत पंचमीचा दिवस होता.

आज पुन्हा त्याने त्या दरवाज्यापुढे जावुन कडी वाजवली आणि पुन्हा कोमल पावलांची ती देवडीवर आली. पण आज पावलांना मेंदी लावलेली होती, त्याने झुकलेल्या नजरेने त्या पावलांना पाहिले आणि विस्मित झाला की गोऱ्या पावलांना मेंदी काय लावली जाते आणि पावलांचे रूप कुठल्या कुठे बदलून जाते. थक्क होवुन तो त्या मेंदीभरल्या कोमल पावलांकडॆ नजर खिळवून होता. त्याला भानच नव्हते की त्याला भिक्षा घ्यायची आहे.

"भिक्षुजी , जरा लवकर , सणावाराचा दिवस आहे", आणि पहिल्यांदाच ऐकलेला हा आवाज कानावर पडल्याबरोबर भिक्षापात्रासवेत त्याची नजरही वर गेली आणि ती वरच राहिली. किती मोहक मूर्ती होती. ......

तो भान विसरुन , टक लावुन तिच्याकडॆ पाहात राहिला....

मनाला एकच चिंता लागून होती ’ मला मोहाने घेरले आहे की काय ? "

आणि नगराकडे पाठ फिरवून तो अरण्याच्या दिशेने निघाला.

संजय आता घनदाट अरण्यात फिरत होता. चालताचालता त्याने फुलुन आलेला अशोकवृक्ष पाहिला आणि तो थांबला. ......

या अशोकाला त्या मेंदीभरल्या, गोऱ्या, कोमल पावलांनी तर ठोकर मारली नसेल ?

मोहाच्या जाळ्यातुन बाहेर पडण्यासाठी संजयनी पुन्हा एक प्रदीर्घ भ्रमंती केली.

मग आला, पानगळीचा ऋतु.

तिथेच एका गर्द पिंपळाच्या सावलीत आसन मारून बसला आणि पडणाऱ्या पिवळ्या, सुकलेल्या पानांकडॆ बघत राहीला - पानगळीची पाने, अगणित सत्ये. एका स्थंभित अवस्थेत तो पडत्या पानांना पहात होता, पहात राहिला. हळूहळू त्याचे डोळे मिटत गेले - "जे बाहेर आहे तेच माझ्या आतही आहे " आसन घालून, डोळे मिटुन बसून राहिला, बसून राहिला ...... न जाणे किती दिवस, किती युगे.

तो जागा झाला.

तो आपल्या शांत-शीतल मनात डोकवला - "माझ्या  वासनाही फिक्या सुकलेल्या पानांप्रमाणे झडून गेल्या आहेत.  फुलं झडतात, गंध उडुन जातात, फांद्या सुकुन जातात. पण पानगळ अमर आहे.

आता तो शांत होता. मन म्हणाले की माझी यात्रा सफल झाली " आता मला परत जायला हवे. "

संजय अरण्यात येताना एक रिकामे पात्र आणि अस्वथ मन सोबत घेऊन आला होता. भरलेल्या मुठीने आणि शांत चित्ताने तो अरण्यातून परतला.

डोळे उचलून त्याने हेही नाही पाहिले की तो कोणत्या गल्लीतून चालला आहे, आणि कोणत्या दारी भिक्षा मागतो आहे. कशासाठी पहायचे, भिक्षा मिळाली की झाले. कोणत्या दारी आणि कोणत्या हातांना भिक्षा दिली जाते याच्याशी संन्यासाला काय करायचे आहे ? झुकलेल्या डोळ्यांनी फक्त देणारीच्या पावलांना पाहिले आणि ते डोळे विस्मयचकीत झाले.

अगदी तशीच गोरी, मेंदीभरली पावले ........... "

मूळ कथा - पत्ते (पानगळ )
कछुए : इतिजार हुसैन
पुस्तक - मोरनामा आणि इतर कथा
कथा-निवड, प्रस्तावना आणि अनुवाद भास्कर लक्ष्मण भोळे. मधुन काही भाग साभार.



जहागिरदार बेकर्स - कर्वेनगर , पुणे - नाशिकच्या जहागिरदार बेकर्सनी पुण्याला दुकान उघडले आहे.

राजाभाऊंची पाऊले मंत्रमुग्ध अवस्थेत जेव्हा वळली तेव्हाच त्यांच्या बायकोला होणाऱ्या संभाव्य धोकयाचा अंदाज आला, आता राजाभाऊ नक्की काय करणार आहेत ते तिला चांगलेच ठावुक होते, अश्या जागी गेल्यानंतर, चांगलासुरका फ्रेश माल बघितल्यावर राजाभाऊ कसे पिसाळतात, त्याच्या येणाऱ्या सुवासाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो, ते  कसे वेडेपिसे होतात, हे घेवु की ते घेवु , हे खावु की ते खावु करत रहातात हे ती जाणुन होती.

कर्वेनगर , नवसह्याद्रीत भटकतांना राजाभाऊंची नजर आपसुकच गणॆश भेळी जवळ नविनच आलेल्या एका पॉश दुकानाकडॆ वळली.
आधी नजर वळली आणि मग पावले.
त्या दुकानाच्या मालकाने आधी गोड बोलुन त्यांचे मन काबीज केले आणि मग त्यांचे पोट.

ताजी खुशखुशीत बिस्कीटे आणि केक. 

 ह्याची चव दाखवा, त्याची चव दाखवा, हे एक पाकीट द्या आणि त्याचे एक, पिळाची खारी दोन पाकीटे, कप केक चार, नानकटाई बांधा, जीरा बटराची चव मस्त आहे, ती  द्या, स्विस खारी हा काही तरी नवा प्रकार दिसतोय, बरं मग ती पण द्या. मग पुतणीच्या नावाखाली अगं तिला श्रुजबेरी आवडतात ती घेवुया , तिला आणखी काय काय आवडते करताकरता , राजाभाऊंच्या मुलाचे नाव त्यांनी पुढे केले, त्याच्या साठी ही ट्रूटीफुटीची बिस्कीटे घेवु करता करता ही अशी यादी लांबत चालली.

आपल्या नवऱ्याला कशी वेसण झालायची ते ह्या बायकांना चांगले ठावुक,

आता उरलेली बिस्कीटे पुढच्या भेटीत.

नाशिकच्या जहागिरदार बेकर्सनी पुण्याला दुकान उघडले आहे.  

जानपहीचान कबसे - देखा तबसे, बातचीत कबसे - हात पकडा तबसे ....





हा रमझानचा महिना म्हणजे दुकानवाल्यांसाठी पर्वणीच. त्यात चुडीवाले बाबांची तर चांदीच चांदी.

Wednesday, August 25, 2010

सुलेमान उसमान मिठाईवाला.

राजाभाऊ जरी रोझे पाळत नसले तरी काय झाले ? ते शुद्ध शाकाहरी असले तरी काय झाले ? ते या रामादानच्या महिन्यात निदान " फिरनी " खाण्यासाठी तरी मिनारा मशिद जवळील सुलेमान उसमान मिठाईवाल्याला भेट देवु शकतात.

रात्रीचे ११.०० वाजले आहेत. सारा महंमद अली रस्ता माणसांनी फुलुन गेला आहे, इफ्तार व खरेदी साठी. खास खव्वय्ये लोकांसाठी तर हा स्वर्गच.

आज रात्री सेनापती रोहनजींच्या एका खादाडी पोष्ट वाचतांना राजाभाऊंनी  या ठिकाणाची फर्माईश केली, मग त्यांच्याचाने रहावेना , मग काय. ताबडतोब, तडक सुलेमान उसमान मिठाईवाल्याकडॆ प्रयाण.

खास रोहनरावांसाठी

जनसेवा दुग्धालय - लक्ष्मी रोड, पुणे.

लक्ष्मी रोडवर राजाभाऊ सपत्नीक फिरायला गेले आहेत आणि जनसेवा दुग्धालयात खाण्यासाठी शिरले नाहीत असे केव्हा होणे नाही. एक वेळ सुर्यचंद्र आपल्या स्थानावरुन ढळतील, सुर्य पश्चिमेला उगवेल, एक वेळ चुलतभावांमधली भाऊबंदकी संपेल पण , वगैरे वगैरे , आणि ते देखील "आज नाही किंवा संपले" याची नकारघंटा ऐकण्यास लागत असतांना देखील.

तिखट मिठाचा सांजा, बटाटा वडा, खरवस, मसाले दुध, साबुदाणा खिचडी, ढोकळा, अगदी मोजकेच पण दर्जेदार पदार्थांची मोहिनीच तशी होती.

वरती १००-१५० ग्रॅम आलेपाक घेवुन तो हाडादणे व तृप्त होवुन बाहेर पडणे.

काहीसे जुनाट , केव्हा केव्हा अगदी पेशवाईच्या काळात मागे घेवुन जाणारया या जनसेवा दुग्धालयाने मध्यंतरी काही काळासाठी आपली कात टाकली होती, पण राजाभाऊंना त्याचे पहिलेच पुरातन रुप भावत होते.

गेल्याच आठवड्‍यातली ही गोष्ट.

जनसेवा दुग्धालय कुठे आहे, इथेच कुठेतरी होते, गेले कुठे करत शोधावे लागले, जेव्हा वर बघुन त्या उपहारगृहाचा बोर्ड पाहुन खात्री करुन घेतली तेव्हा कुठे आत पाऊल टाकले, एवढा याचा कायापालट झालेला, अगदी अगदी ओळखु न येण्यासाठी. नव्या रुपात, नव्या खाद्यपदार्थांच्या यादी सह , नव्या रुपात, आधुनिक थाटामाटात. चकचकीत.

राजाभाऊंनी वटाणा उसळ व ब्रेड खाल्ला, तर त्यांच्या बायकोनी साबुदाणा खिचडी.

पहिल्याच घासात राजाभाऊंच्या बायकोने सांगुन टाकले " चव बदलली आहे, पुर्वीची चव नाही राहिली "

आंबावडी खातखात राजाभाऊंनी मान डोलावली. "खरं आहे तुझे म्हणणे" . आंबावडी व त्याच्या आधी खाल्लेल्या बटाटावडयामुळे त्यांचेही असेच मत झाले होते.

आयुष्यात पहिल्यांदाच राजाभाऊंचे व त्यांच्या बायकोचे एकमत झाले. ( " तु म्हणशील ते खरं " असे ते जे नेहमी बोलत असले तरी देखिल )

Tuesday, August 24, 2010

प्रत्येक ..

सिने निर्माता, सिने निर्माती असलेल्या प्रत्येक मराठी माणसाने एका तरी मराठी चित्रपटाची निर्मीती केलीच पाहिजे.

घिर घिर के आसमां पर छाने लगी घटांये , कह दो कोई पिया से परदेसवा ना जाये

हिरवा नागतोडा , जणु गवतच

ह्याला शत्रुंपासुन बचाव करायला मुद्दामुन गवतात लपायला नको.


मग ह्याने काय करावे ?

अंतिम सत्य



आमदारांनी आणि नगरसेवकांनी काय पाप केले आहे ?

अखेरीस आमच्या खासदारांनी आपल्या पगारात भरभक्कम, भलीमोठाली वाढ करुन घेतली. ( तरी बरं यांनी Performance Bonus ची मागणी केली नाही )

आता प्रश्न असा पडतो की आमच्या आमदारांनी आणि नगरसेवकांनी काय पाप केले आहे ? या भडकत्या महागाईच्या दिवसात त्यांचे पगार नको का वाढायला ? (खरं म्हणजे लोकांचे पगार हे चांगले असावेत जेणे करुन त्यात त्यांचे भागु शकेल, ४० % कमाईचे इतर मार्ग शोधण्याची त्यांना गरज भासु नये. )

रक्षाबंधन - सरहद के इस पार

"पावसाळा हा किती अप्रतिम ऋतू असतो. वस्तूंचे रंगरूपच पालटून जाते. शिवाय रोज एक नवा सण. आज छ्ड्‍याचा मेळा, उद्या रक्षाबंधन, परवा जन्माष्टमी आणि प्रत्येक सणावार पाऊस हा हवाच. जन्माष्टमीच्या दिवशी जर पाऊस पडला नाही तर कन्हैयाजींची दुपटी कशी काय धुतली जाणार आणि रक्षाबंधनावर तर चार थेंब का होईनात पाऊस पाहिजेच. रक्षाबंधनाच्या सोबत त्याला रमेशची आठवण झाली. ..........

.... जो जेव्हा त्यांच्या घरी पोहोचायचा तेव्हा विमल त्याच्या मनगटावर राखी बांधायची. तशी राखी म्हणजे तरी काय रेशमाचे काही धागे आणि चकचकती बेगड. पण ती जेव्हा मनगटाबर बांधली जाते तेव्हा बघा माणूस कुठून कुठे पोहोचतो. त्याने रक्षाबंधनाचा दिवस कल्पनेत उभा केला. तो गाडीतून उतरून सरळ रमेशच्या घरी पोहोचला होता. विमलने त्याला राखी बांधली होती. नंतर तो आणि रमेश संध्याकाळपर्यंत सजवलेल्या बाजारांतून आणि गल्लांमधून पिरत राहिले आणि विविध दुकानात थांबून थांबून मिठाईही खाल्ली होती . पण त्या दिवसाची अगदी लख्ख आठवण तो कल्पनेत उभी करू शकला नव्हता. ...

... येऊन जावुन त्याच्या जिंदगीला केवळ काही आठवणींचा तेवढा आधार उरला होता. पण त्या आठवणीही हळूहळू एकएक करुन निसटून जात होत्या. ...

...पण हिंदूस्तानातून पाकिस्तानात जाण्याचे अर्थ काय असतात हे त्याला कदाचित नाहीतच नसावे. ते अर्थ समजून घेण्याचा त्याने फारचा प्रयत्नच केला नव्हता. "

केव्हा केव्हा काही पुस्तके अस्वस्थ करुन सोडतात.

फाळणीच्या वेळी सरहद के उसपार गेलेल्या इंतजार हुसैन यांनी लिहिलेल्या "मोरनामा आणि इतर कथा " फार मनाला त्रास देत रहातात. या कथांचा अनुवाद भास्कर लक्षण भोळे यांनी केला आहे.

श्रावण - सरहद के इस पार

आता पर्यंत वाटत होते की केवळ सरहद के इस पार असलेल्यांनाच, आलेल्यांनाच झळ लागलेली आहे , केवळ आपलीच माणसे होरपळुन निघाली आहेत या फाळणीमुळे. तसा समज झाला होता खरा.

पण तो गैरसमज नाहिसा झाला एक पुस्तक वाचत असतांना.

"जे ते हरवुन गेले "- मोरनामा आणि इतर कथा - अग्रगण्य पाकिस्तानी लेखक इंतजार हुसैन - कथा-निवड , प्रस्तावना आणि अनुवाद - भास्कर लक्षण भोळे.

"मी जर खरोखरीच जहानाबादहून निघालो असेन तर मला फक्‍त एवढं आठवतं की पावसाळा ऋतु उलटला होता आणि कोकीळा आंबरायांमधून निघुन गेलेली होती, आणि आमच्या अगंणातल्या निंबावर टांगलेला टांगलेला झोका उतरला गेला होता. " हे सांगता सांगता तो विचारात हरवला. त्याचा सुर मंद झाला. तो जणू स्वतःशीच बोलत होता - पण ती झोका उतरवला गेल्यांनंतरही आमच्या घरी येत असे . विचाराविचारांत तो दूर गेला. श्रावणभिजल्या त्या दिवसांपर्यंत जेव्हा अंगणात उभ्या असलेल्या त्या घनदाट निंबाच्या खाली पिवळ्या पिवळ्या निंबोळ्या सांडलेल्या असत आणि झोक्यावर बसून ती लांब लांब झोके घेत असे आणि गात असे "इवले इवले थेंब रे माझा सावन झोका रे ". पण ती तर पावसाळ्यानंतरही आमच्या घरी यायची ..... हो अगदी नक्की ... पण त्या दिवशी कुठे होती ? तो आठवण्याचा प्रयत्न करकरुन थकला, म्हणाला " काहीच आठवत नाही त्या दिवशी ती कुठे होती. "

तरूण निराश झाला. म्हणाला, "फक्‍त एवढंच आठवतं की माझा बाप नमाजाच्या चटईवर बसला होता आणि हातात जपमाळ होती, त्याचे ओठ हलत होते आणि घरात सर्वत्र धूरच धूर दाटला होता.


या कथा वाचतांना वाटु लागते की लागलेल्या या आगीत सारे सारे काही जळुन जाते आणि विषेशःता जेव्हा हा पेटणारा वणवा मानव निर्मीत असतो.

Sunday, August 22, 2010

पन्नासीला येवु घातलेला म्हातारा निघाला ट्रेकींगला




आषाढात फिरायला जावे, ज्यावर चढण्याची हिम्मत ही केवळ वाऱ्यालाच होते व झेप घेण्याची  तुफानी पावसांच्या धारांना, ह्या अश्या कडेकपारींच्या या प्रेमळ सह्याद्रीच्या डोंगररांगात. मनमुराद पावसाचे रौद्ररुप उपभोगायला जावे ह्या सह्याद्राची अंगाखांद्यावरील अलंकार असलेल्या किल्यांवर. मुसळधार पावसात किल्यांवर जावे, कुठेतरी घळीत, लेण्यांमधे, गुहेत रात्री मुक्काम करावा, कोसळ कोसळ कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तुडव तुडव तुडवलेल्या ,झोडप झोडप झोडपलेल्या,  भिज भिज भिजवलेल्या या क्लांत देहास जरासा आराम द्यावा इतिहास जागवत पुन्हा पुढच्या हवे हवे हवेसे वाटणारे कष्ट, श्रम करण्यासाठी लागणाऱ्या झेप घेण्याच्या पुर्वीचा.

श्रावण मास. हा  गरजुन , बरसुन, उमढघुमढ करुन शांत झालेला घन निळा हळुवारपणॆ, लळीवारपणे, लाडिकवाण्या सरींने धरतीला न्ह्यावु घालत असतो. अश्यावेळी सह्याद्रीचे रुप पालटुन जाते, त्याचा जो कायापालट होतो तो न्हाह्याळायला जावे ते पठारांवर, त्या उग्रस्वरुपी, बेलाग, उभ्या कड्‍यांच्या माथ्यावरील विस्तीर्ण पठारावरील हिरवेगार कुरणांवर. पठारांवर जावे पहुडायला, बागायडाला, बिलगायला, डोळे भरभरुन, भरभरुन त्याचे हे हिरवेसाजरे रुप मनात साठव, साठव, साठवायला, ज्यावरुन नुसतेच चालचाल चालायला जाणॆ हे एक सुंदरसे, सुखद स्वप्न असते, ह्या शिदोरीवर, आठवणीवर पुढील सारे वर्ष कंठायला. असे हे लुसलुशीत गवत, त्यावर बहरलेली ती लाघवी रानफुले, ओत तोत ओतुन निवांत झालेला. श्रमलेला पाऊस, त्या हिरव्यागार धरित्रीवरल्या नानाविध हिरव्या रंगाच्या अनेक छटा, ती त्रुप्त झालेलेली धरा, मग दर्याखोऱ्यांमधुन अलगदपणे वर येत राहाणारे, रिक्‍त झालेले, हलकेसे कापसासारखे घन, आणि ह्या साऱ्या देखाव्यावर मायेचे देखणॆ पांघरुण घालणारे सुरेखसे इंद्रधनुष्य. सारे सारे केवळ अप्रतीम , नितांत देखणॆ रुप. जणु शब्दांच्या पलीकडले. त्याचे वर्णन करणॆ महाकठीण, हे सारे , सारे केवळ अनुभवायलाच हवे, ह्या सोहळ्याचा भरभरुन आनंद लुटायला हवा.

अश्या पठारांवर जावे जेथे केवळ निसर्गाचा आणि फक्‍त निसर्गाचाच सहवास असावा, वेड्‍यावाकड्‍या वागणाऱ्या माणसांचे जंगल नसावे , आणि अशी ठिकाणे बघण्यासाठी नेणाऱ्या श्री. सुरेश परांजपेंची सोबत साथ असावी आणि दिलाच्या राणीचा सहवास.

काल राजाभाऊ माढंरदेवच्या पठारावर भटकंतीस गेले. त्यांना जायचे होते निसर्गदेवतेच्या प्रांगणात, निसर्गदेवतेच्या डोळे भरभरुन घेतलेल्या दर्शनाने मंत्रमुग्ध होवुन जाण्यासाठी, त्यांना जायचे नव्हते काळुबाईंच्या मंदीरात, त्यांचा पडाव होता तो या पठाराच्या टोकाला असलेल्या बालेघरच्या आणखीन पुढे असलेल्या, खोगीराप्रमाणॆ आकार असलेल्या "चौऱ्या" वर.

चौऱ्याला जावुन परत यायल्या लागलेल्या चारपाच तासाच्या सुखद पायपिटीनंतर जेव्हा ते येरुळी आणि डुयीची वाडीला जाणाऱ्या रस्ताला लागेल तेव्ह्या निसर्गाचे एक अनोखे रुप त्यांची वाट बघत होते, बोलबोलता सारा परीसरावर ढगांनी पांघरुण घातले, सारे सारे ढगांत विरघळुन गेले, बघबघता पुढची सारी वाट धुक्यात हरवुन गेली, दाट धुके, भर दुपारी तीन-चारच्या सुमारास.

मधेच उघडदीप होत होती, समोर पसरलेला पांडवगड व खाली दरी दिसणाऱ्या धोम धरणाचे दृष्य काय विहंगम दिसत होते.

वाटेत लागण्याऱ्या अंबाडी खिंडीत एका वाड्‍याच्या आवारात बारा महिने वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी अडवले गेलेले आहे ते पहाणॆ झाले.

प्रत्येक आल्हाददायक अनुभवांचा शेवटही तसाच अविस्मरणीय व्हायला लागतो, भल्यामोठाल्या इंद्रधनुष्याने ते भारावलेले क्षण सीलबंद करुन टाकले.

मेरे नामुराद जुनुन का, है इलाज कोई तो मौत है.
मौत अ हं, ही तर नवसंजीवनी मिळालेले एक नवीन जिंदगी.

Thursday, August 12, 2010

नकार द्या., नकार द्या.

आज ग्राहकांनी रिक्षाटॅक्सीत बसायला नकार दिला.

आता त्या धर्तीवर

खड्डे, महाप्रचंड खड्डे पडलेल्या, उखडलेल्या, पदपाथ नसलेल्या, फेरीवाल्यांनी व्यापलेल्या, उघडी, झाकणे नसलेल्या , थेट पाताळाची वाट दाखवणाऱ्या गटारे असलेल्या, सांडपाणी भरुन वाहणाऱ्या , घाणीने भरलेल्या, कचऱ्याने तुंडुंब भरलेल्या, पेव्हर बॉगनी सत्यानाश केलेल्या , साधा रस्तापार करण्यासाठी वहातुक बंद करण्याके सिग्नल नसलेला, झेब्राक्रॉसींग नसलेला, असल्यास वहानचालकांनी आपली वहाने उभी करुन अडवलेल्या , पादचाऱ्यांच्यासाठी अत्यंत असुरक्षित असलेल्या, रस्तावरुन ,

एक दिवस, फक्त एक दिवस, चालण्यास रोज जीव मुठीत घेवुन चालणाऱ्या पादचाऱ्यांनो नकार द्यावा.

नको हो नको,

नको हो नको,

नका, नका, नगरसेवकांना, आमदारांना या मलेरियानिर्मुलनासाठी रस्तावर उतरण्याचे आदेश देवु नकात, त्यांना कामाची आणि विशेषता या अश्या कामाची सवय नाही.

त्यापेक्षा ४० % मधल्या काही टक्के खर्च करुन दुसऱ्यांकडुन ही कामं त्यांना करवुन घेवु द्यात.

"मच्छरदाणी वापरा , मच्छरदाणी वापरा "

आज उदासीन आणि बेपर्वा मुंबई महानगरपालिकेने सर्वांना फार मोलाचा सल्ला दिला आहे.

मुंबई आरोग्य अभियान, आपली मुंबई, निरोगी मुंबई अंतर्गत त्यांनी रामबाण उपाय सुचवला आहे, मलेरीयापासुन प्राण वाकवायला, "मच्छरदाणी वापरा , मच्छरदाणी वापरा "

राजाभाऊंपण आज म.न.पा ला एक फुकटचा सल्ला देवु इच्छितात.

"कारण मुळापासुन दुर करा, गलिच्छ, अस्वच्छ, मुंबई स्वच्छ करा, युद्धापातळीवर कामं हाती घेत ती स्वच्छ करा , त्यात लोकसहभाग मिळवा, लोकांपर्यंत ही मोहीम आपल्या अधिकाऱ्यांमार्फत घेवुन जा, त्यांचे मतपरीवर्तन करा. रहिवासी संघटना स्थापन करायला लावा, लोकांना पण रस्त्यावर आपण रहात असलेला विभाग स्वच्छ करण्यासाठी व तो तसाच साफ ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत करा, नुसत्या जाहिरातीनी, मोहीमांनी काय होते ? असंख्य वेळ्या त्या फसलेल्या आहेत. "

रिक्षाटॅक्सी मिटर जॅम आंदोलन.

आज राजाभाऊंनी प्रवाश्यांनी पुकारलेल्या "रिक्षाटॅक्सी मिटर जॅम " आंदोलनात आनंदाने भाग घेतला.

आतापर्यंत हे वहानचालक अडलेल्या, नाडलेल्यांना , सर्वांना आपल्या मर्जीनुसार , आपल्या तालावर नाचवत होते. आज गरीब बापुड्या, यांच्या मेहरबानींवर प्रवास करणाऱ्यांनी त्यांची मेहरबानी स्विकारण्यास चक्क नकार दिला.

केव्हातरी हे घडायला हवे होते.

यांच्या संघटना नेहमीच सर्वांना वेठीस धरत आलेल्या आहेत, प्रवाश्यांची कुठेतरी, कोणीतरी एकजुट करणे गरजेचे होते, त्याची सुरवात आज झाली.

आज कदाचीत मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांचा या आंदोलनात सहभाग लाभला नसेल, पण झोपलेला सुस्त अजगराने डोळे जरासे का होईना पण किलकिले केले.

Tuesday, August 10, 2010

मागील पानावरुन पुढे

काय हो राजाभाऊ,

पुण्याला झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी देखील असाच काहीसा धुरळा उडाला होता ना हो आणि हो, हे बालेवाडीमधले सुसज्ज क्रिडांगण राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पुन्हा वापरायचे सोडुन नव्याने कोट्यावधी रुपये खर्च करत परत हा दिल्लीमधला वायफळ खर्च कशाला ?

का आपली "वापरा आणि फेकुन द्या " का वापरा आणि कमवा नीती ?

Saturday, August 07, 2010

काय होणार ?

नुसत्या रुग्णालयाला भेटी देवुन काय होणार ? त्या वेळेपुरती ती रुग्णालयं चकचकीत केली जातात. 
केवळ परप्रातीयांच्या माथी दोष देवुन काय साध्य होणार ?

मुळ समस्या आहे तशीच राहीलेली. 
अस्वच्छ मुंबई, गलिच्छ मुंबई, स्वतःला ओरबडुन देणारी, स्वतःचा लचका तोडुन देणारी मुंबई, स्वःताला लुटु देणारी मुंबई.. 

हे शहर स्वच्छ, साफसुतरे करण्यासाठी गरज आहे ती लोकसहभागाची, लोकचळवळीची.  
गरज आहे ती नेत्यांच्या शब्दासाठी आपले प्राणपण देणाऱ्यां कार्यकर्ते, नेते, नगरसेवक, आमदार यांनी रस्तावर उतरण्याची. 

स्वच्छतामोहीमी आखण्याची.

पण ....

आपले आपल्या शहरावर एवढे प्रेम असेल तर हे आदेश दिले जावेत, 

रस्तावर उतरा, विभागवार, रस्तावार , गल्लीवार रहिवाश्यांच्या सभा घ्या, युध्दपातळीवर प्रयत्न करुन मुंबई स्वच्छ करा.

मुळकारण समुळ नष्ट व्हावे. 

(केवळ मलेरीयाविरुद्ध युध्दाचे फलक लावुन काय होणार ? दक्षिण मुंबईत ज्या गल्लीमधे ही शिबीरे भरवली गेली, धुरफवारणी केली गेली, घरगल्यांमधे साठलेल्या सांडपाण्यावर किटकेनाशके फवारली गेली, त्याऐवजी त्या विभागातल्या घरगल्लांची सफाई केली गेली असती तर ? )


आणि हाच कदंब

आणि हाच कदंब शरदऋतुत -

हल्ली इंद्रधनु, मेघाबरोबरच नाहिसे झाले आहे.
सौदामिनीची गगनपताका फडकत नाही.
बगळे, आपल्या पंखांमुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यानें
आकाश घुसळून टाकीत नाहीत.
मयूर पण, माना उंच करून
नभाकडॆ पहात नाहीत.

नृत्य न करणाऱ्या मयूरांना सोडुन,
मदन
मधुर कुंजन करणाऱ्या हंसाजवळ जात आहे.
कदंब, कुटज, अर्जुन , सर्ज व नीप वृक्षांचा त्याग करून
पुष्पश्री
सप्तच्छदाजवळ जात आहे

ऋतुसंहार - कालीदास- अनुवादक - श्री, ज्ञानेश्वर कुलकर्णी

पुन्हा एकदा कदंब

हा कदंब परत एकदा भेटला तो "ऋतुसंहार’ मधे.

श्री,ज्ञानेस्वर कुलकर्णी यांनी कालीदासाच्या "ऋतुसंहार" चे मराठीत छानसा अनुवाद केला आहे. त्यामधे ते लिहीतात,

शुभ्र कमलांची आभा असलेल्या मेघांनी
ज्यांच्या पाषाणांना चुंबिले आहे
असे हे पर्वत,
सगळीकडॆ खळाळणाऱ्या जलौघांनी
व नर्तन करणाऱ्या मयूरांनी
गजबजुन गेल्यामुळे
विरही जनांना अस्वथ करीत आहेत.

कदंब, सर्जा, अर्जुन व केतकी
यांच्या फुलांनी सुगंधीत झालेला
व जलतुषारांनी भरलेल्या मेघांमुळे
शीतल झालेला
हा वायू,
कोणाचे बरं चित्त चाळवणार नाही ?

आज आपल्या केसातं गुंफताहेत अंगना
माला नवपुष्पांच्या,
बकुल फुलांच्या,
कदंबकळ्यांच्या, शुभ्र केतकींच्या.
आणि लावीत आहेत कानांवर
मनाप्रमाणॆ कर्णभुषणे ककुभकुसुमांची

नूतन जलधारांच्या वर्षावाने
उष्मा नाहिसा केलेला
हा वनप्रदेश
प्रमुदित झाला आहे
कदंबांच्या नवांकुरांनी;
नर्तन करीत आहे
वाऱ्यांनी हलणाअऱ्या शाखांनी;
हासत आहे केतकेच्या नवकोंबांनी.

मेघांचा समुदाय असलेला हा वर्षाकाल
वधूंच्या केसात माळत आहे
एखाद्या प्रियकराप्रमाणॆ.
जुईच्या कळा व उमललेली फुले,
आणि मालती-बकुल फुलांची माला,
कर्णभुषणॆ म्हणून लावीत आहे कानांवर
नवजात कदंबाची फुले.
श्री,ज्ञानेस्वर कुलकर्णी यांनी कालीदासाच्या "ऋतुसंहार" चे मराठीत छानसा अनुवाद केला आहे. त्यातले हे श्लोक.

Friday, August 06, 2010

अन्नासाठी काहीही करवीशी जगदीशा



रात्रीचे बारासाडॆबारा वाजलेतं. कचऱ्यामधे केवळा हा देह जगवण्यासाठी ह्या गृहस्थांना अन्न शोधावे लागतेयं.

हि अशी वेळ वैऱ्यावरही ना यावी.

नीपं दृष्टवा हरितकपिंश केसरैरर्ध्रुढै - आणि चूडापाशे नवकुरबकं चारु कर्णॆ शिरीषं, कादंबाचा बहर लुटतो वर्षबिंदु घनाचा

तर हा असा कदंब. 
कैकवेळा त्याला पाहिलेला. फुललेला, बहरलेला, स्वतःच्या तालात नादवलेला. 

लोकरंग मधे अपर्णा मोडकांचा लेख वाचल्यानंतर त्याची खुणगाठ पटली. 
मग तो कदंब भेटला शरदिनी डहाणुकर लिखीत "नक्षत्रवृक्ष " मधे. 
त्याचे सौदर्य मग खुलुन उठले ते मेघदुतात.   

मेघदुताचा  नीरा वैद्य, पद्मा कुलकर्णी, अनुपमा कुलकर्णी आणि मृदला गडनीस यांनी सुंदर भावानुवाद केलेयं. 

कदंबाबद्द्ल कालीदास लिहीतात ,

भुंगे कदम्बच्या अर्धस्फुट फुलातील हिरवट पिंगट केसर पाहुन, हरीण नदीकाठी पानथळीवरेल कर्दळीला प्रथमच आलेल्या कळ्या मोठ्या चवीने खावुन आणि हत्ती अरण्यातील तप्त भूमीतून येणाऱ्या मृदुगंधाचा घमघमाट हुंगुन तुझा मार्ग जाणतील.

आता तू पुढील मार्गावर लागलेल्या "नीचेः" नावाच्या पर्वतावर विश्रांती घे. पर्वतावरील कदम्ब वृक्षांची फुले तुझ्या पहिल्याच वर्षावाने एकदमच फुलतील. पर्वतभर फुललेली ही फुले तुझ्या स्पर्शाने पर्वतावर आलेल्या रोमांचाप्रमाणॆ दिसतील, या फुलांचा मदिरगंध पर्वतभर पसरलेला असतो, त्याचाच परिणाम म्हणून की काय या पर्वतावरील गुहांमधे वारांगना आणि विलासी नागरीक यांचा धुंद आणि उत्शॄखंल प्रणाय रंगतो. चोरट्या प्रणयाचा रतीपरिमल आसमंतात पसरलेला असतो. 

तुझ्या आगमानाने फुलणाऱ्या कदंबापुष्पांनी त्या आपला भांग सजवतात, कोमल , केसरमय , गोंडस शिरीषकुसुमांना श्रुंगारात कर्णाभुषणे स्थान असते. 

"सुश्लोकमेघ’  मधे रा.चिं.श्रीखंडे लिहीतात 

पुष्पे कदंबा हरिताभ पीत पाहोनि, ज्या केसरही न पूर्ण,
सरित्तटी ओलिंत कंदलीना आल्या कळ्या त्या पहिल्या गिळून,
वनांतरीच्या क्षितिच्या सुगंधां आस्वादुनी त्वत्पथ ये कळोनी - 
भृंगा, कुरुंगा, वनिच्या मतंगा परोक्ष गेलासि गळोनी  !

विश्रांतीसाठी वस तेथ मित्रा ! नीचैः प्रथा ज्या गिरीलागि होत
त्वन्मीलनें फुल्लकदंबरुपे तो प्रेमरोमांचितस्त्राचि मूर्त !
वारांगनांच्या रतिगंधयोगे ज्याच्या गुहा उत्कट दर्शवती
की यौवने तेथील नागरांची उद्दामता केवढि ती धरती !

लीलांबुजे , जेथ, कर स्त्रियांच्या, केशात कुंदे माळलेली
पराग लोध्रांतरिंचे पडोनी त्यांची मुखश्री धवलत्व ल्याली.
कोरंटिही भूषवि केशपाशां, कर्णांवरी शोभतेसे शिरीष
तैशी तुज्या आगमिचीं कदंबे भांगात त्यांच्या सजती विशेष !

याच कदंबाबद्द्ल द.वि.पंडीत यांनी जो मेघदुताचा अनुवाद केला आहे त्यात ते लिहीतात,

खाई कंद प्रथम फुलले गंध घेई धरेचा
कादंबाचा बहर लुटतो वर्षबिंदु घनाचा
पुण्यांशाचा तव सुचीविला मार्ग तद्विक्रमांनी
सारंगानी मृगगजालीचातकादि क्रमांनी ॥

नीचैश्शेल श्रमहर तिथे थांब विश्रांतिसाठी
त्वत्संयोगे गंहिवर तया नीप-पुष्पेच मोठी
वारस्त्रीच्या रतिपरिमळे धुंदशा गव्हरी तो
उतूं हाते तरुणपण तें गांवचे दाखवीतो ॥

ताजीं पद्में मिरविती करी लाविती कुंदवेणी
घेती लोध्रोद्ववरजवळे गौरता गौरवोनी
वेण्यांमधे कुरबक नवे कर्णभागी शिरीष
त्वकादंबे सजविति वधू रम्य सीमन्तदेश ॥

Sunday, August 01, 2010

बंद आणि गॅल्पस आणि विनय हेल्थ होम

तर हा बंदचा प्रकार राजाभाऊंना फार भावला.
पुढचा शनिवार. मुंबईमधे मुसळधार पाऊस नुसता कोसळुन राहिलेला, त्यात राजाभाऊ मुलासाठी लॅपटॉप घेण्यासाठी सकाळीच सहकुटुंब, सहपरिवार बाहेर पडलेले.
या पावसाळी बढीया माहोल मधे कुठे जेवायला जायचे , अश्या ठिकाणी की जिथे बसुन पाऊसाची मस्तपैकी मजा लुटु शकु, ज्या जागी बसल्याबसल्या बाहे रपारप बरसणारा पाऊस, सर्वत्र छायी हुवी हरीयाली,  ज्याच्या व बाजुची घराच्या दगडी भिंती साऱ्या साऱ्या वेलीने आच्छादलेल्या, जेथे जेवण अत्यंत चविष्ट मिळाते , छानसे बंगलेवजा रेस्टॉरंट असावे. तर राजाभाऊंना एक नाव त्वरीत आठवले, अशी ही जागा जी त्यांची फेव्हरेट होती. 

मुंबई रेसकोर्स मधे "गॅल्पस" नामक एक रेस्टारंट आहे जेथे मोघलाई व कॉंटीनेंटल पदार्थ पार चवदार मिळतात, असे एक ठिकाण ज्याच्या आतबाहेर सगळीकडॆ घोडे , घोड्याच्या शर्यतीने भारलेले.

बाहेरील कोसळणारा पाऊस पहात , मैदानात वाढलेल्या हिरव्यागार गवताने मनाला तोशीवले, शरीराची भुक ती तर गॅल्पस मधल्या जेवणाने भागवलेली.

रात्र झाली. राजाभाऊंच्या मुलाचे परत फर्माईश चॅनल सुरु झाले, तिखट, चटकदार, गरमागरम मिसळपाव खायला जाण्याची त्याची इच्छा मग त्याच्या बापाने त्यांना फणसवाडीच्या नाक्यावर असलेल्या "विनय हेल्थ होम’ मधे नेवुन पुरवली. त्यांछ्या साठी पातळभाजी पाव, त्यांच्या बायकोने मागवला साबुदाणा वडा , जो ती केवळ त्या सोबत मिळणाऱ्या चटणीसाठी , जिच्यासाठी ती जीव टाकते, व मुलाने दहीमिसळ मागवली.


बंद आणि सयाजी, गोडवा, जगात भारी कोल्हापुरी आणि उमीया कच्ची दाबेली

बंद म्हणजे साफ बंद. राजाभाऊंच्या बायकोनी त्यांना निक्षुन सांगितले.

राजाभाऊंनी मनाशी विचार केला, बंद काय फक्त विरोधी पक्षांनीच पाळायचा असतो ? कधी तरी (की नेहमीच ) एखाद्या दिवशी सत्ताधारी स्वामिनीने पाळला तर काय बिघडले.

पण हा लाक्षणीय बंद जेव्हा दोन दिवस पाळायचे ठरवले ना तेव्हा मात्र जरा काळजी वाटायला लागली, कसे काय आता निभवणार ? दोन दिवस स्वयपाकघर बंद म्हणजे जरा अतीच.

दिवस पहिला.

बंदची सुरवात भरल्यागच्च पोटांनी, थाटात व्हायला पाहिजे करुन मग ते वाकडला नव्याने आलेल्या सयाजी मधे बुफे जेवायला गेले.  पुण्यामधे चांगल्या बुफे जेवणासाठी सयाजीचा क्रमांक फार वरती लागायला हरकत नाही. फार अगत्यशील कर्मचारीवृंद, छानशी जागा, आणि चविष्ट , नाना प्रकार असलेले जेवण, स्टार्टस, सॅल्डस, कॉन्टेनेंटल पदार्थ, बिर्यानी पासुन सर्वकाही आणि हो भरपुर वेगवेगळ्या प्रकारची डॆसट्‌र्स ( राजाभाऊ फक्त डेसर्टसच खायला जातात हे त्यांच्या आकारमानावरुन नक्की कळुन येते ), हे सारे अवघे रु. ३७५ मधे आनि वर परत कॉरपोरेटसमधे काम करणाऱ्यांसाठी १० % सवलत. मजा आली.

रात्री मात्र बाहेर पडायचा कंटाळा आला, मग ते रहात असलेल्या गृहसंकुलातील "गोडवा" मधे वाग्यांचे भरीत व भाकरी खायला गेले.


दिवस दुसरा.

स्थळ ’जगात भारी कोल्हापुरी " मधे अख्खा मसुर ची,  कोल्हापुरची एक फाकडी भाजी खायला, सातारा रोडवर, सीटी प्राईड समोर गेले, सोबत ही भली मोठी रोटी, भरपुर मस्का मारलेली.

अख्ख्या मसुराची भाजी आणण्याआधी त्यांच्या समोर एका छोटाश्या वाटीत  चव घायला म्हणुन , किती तिखट भाजी हवी हे जाणुन घेण्यासाठी थोडीसी भाजी आणुन दिली गेली.

रोटीचा आकार बघुन दडपलेल्या जीवास शांत करण्यासाठी मग "खुस्का राईस " हादाडला गेला.

आता तरी बंद मागे घे या विनंतीला पहिला मोडता घातला गेला तो त्यांच्या सुपुत्रा कडुन, त्याला म्हणॆ नवसह्याद्री मधे "उमीया कच्छी दाबेली " मधे दाबेली खायला जाण्याची इच्छा झालेली.

वारजेल्या रहाणाऱ्या एक बाई, येथे नवसह्याद्रीमधे जे गणेश भेळीचे दुकान आहे त्याच्या कोपरय़ावरुन जरापुढे वळले की डाव्या हाताला, चितळे बंधुंच्या जरा पुढे दाबेलीचा स्टॉल लावतात. फार चांगली येथे कच्छी दाबेली मिळते.

बंद यशस्वीरित्या पार पडला. सर्व जणांचे त्याला चांगले सहकार्य मिळाले.


शिर्डीचे साईबाबा की सोन्याचे साईबाबा ???

शिर्डीचे साईबाबा की सोन्याचे साईबाबा ???  
पडक्या मशिदीमधे फाटक्या चिंध्याने बांधलेले फळकुटावर झोपणारे , अत्यंत साधी रहाणी असणारे साईबाबा आणि आता कथाकथीत भक्तांनी त्यांना सोन्याने मढवुन टाकलेले  त्यांचे रुप.

बसायला सोन्याचे सिंहासन, सोन्यानी मढवलेला महाल, सोन्याची छत्रचामरे, सोन्याच्या पादुका, वेळ बघायला सोन्याचे ११ लाखाचे घड्याळ, सोन्याच्या पादुका आणि फिरायला सोन्याची पालखी.


तरी नशीब चांगले अजुन तरी साईबाबांची संपुर्ण सोन्याची मुर्ती करण्याचे कोण्या धनवान भक्ताच्या मनात आलेले नाही.

एक जमाना असा होता, शिर्डी एक खेडेगाव होते, अगदी तुरळक भावीक मंडळी यायची आणि त्यांची रहाण्याची सोय चक्क समाधी मंदिरात वरच्या मजल्यावर असलेल्या खोल्यांमधे केली जायची. 

आणि मग हळु हळु देवस्थानाचे रुपांतर संस्थानात, एका साम्राज्यात होत गेले. 

मलेरीयाग्रस्त मुंबई

मलेरीयाग्रस्त मुंबई आणि मी पाच हजारकोटी रुपयाचा गैरव्यवहार केला तर तु ६ हजार कोटींचा ह्याचे भुषण वाटणारे नेते- 





श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र

घीर घीर के आसमां पर छाने लगी घटायें
कह  दो कोई पियासे घुमने जाये.

मनमुराद वर्षावर्षाव झेलण्यासाठी, हिरवाईने नटलेल्या सृष्टीचे डोळ्याचे पारणॆ फेडणारे वैभव न्याहाळायला जाण्यासाठी , झऱ्याचे पाणी पित आपली तृष्णा शमावण्यासाठी राजाभाऊ जेवढे आतुर झाले होते तेवढीच ती अनात्सुक. ते म.रा.प.म. च्या बसनी प्रवास करणॆ, ती पायपीट तिला नकोशी झालेली.

मग राजाभाऊंनी एक अप्रतिम स्थळ शोधुन काढले, पुण्याजवळील पौड-कोळवण्याच्या पुढे हडशी गावात असलेले " श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र ". एक निसर्ग्यरम्य लावण्यमयी जागा.

चांदणी चौकात १५-२० माणसे कोंबंकोंबलेल्या जीपातुन आता कसा प्रवास करायचा ह्या विचारात पोटात आलेला गोळा. तेवढ्यात समोरुन कोळवणची आलेली बस.

मस्तपैकी पावसाने ताल धरलेला, सारे सारे कसे भारलेले , जेथवर लक्ष जाईल तेथ पर्यंत फक्त हिरवा आणि हिरवा रंग, नाना छटा घेवुन राहिलेला, आल्हाददायक वातावरण, डोंगरमाथ्यावर धडका देत , तो व्यापुन झाकुन टाकलेले मेघ, अवखळ झरे, आणि हाडह्सी गावातुन क्षेत्राकडॆ जाणारा छानसा छोटासा नीटनेटका छानसा घाट, दुतर्फा लावलेले कल्पतरु आणि आमराई, तो तिथला खालच्या अंगाला दिसणारा तलाव, तो धबधबा , बस्स और क्या चाहिये जीने के लिये.

हिरवी, ओली , गार हवा , मोकळ्या हवेतील प्राणवायु
 नाही नाही हे सारे पेलवत, मुंबईमधे रहाणाऱ्या माणसाला.


यहीं बहार है यही बहार है दुनीया को भुल जाने की, खुशी मनानेनी

ये प्यारे प्यारे नजारे ये थंडी थंडी हवा, ये हल्का हल्का नशा
निकलगे आ गयी रुत मस्तीया लुटानेकी, खुषी मनानेकी.

वर पोचलो सारे दृश्य पालटले, नीटनेटका मंदिराचा परिसर, सुरेख देवालय, सभोवतालचे गवतांनी आच्छादलेले गवती कुरण, त्यात बसण्यासाठी केलेल्या घुमटी.

मन प्रसन्न झाले.

आणि प्रसन्न झालेले मन आणखीन खुष झाले ती समोर आलेली गरमागरम कांदा भजी आणि वाफाळलेली कॉफीचा स्वाद घेतांना. बाहेर रपारपा पडणारा पाऊस, गरमागरम कांदा भजी आणि सोबत ती. तिचा हवाहवासा वाटणारा सहवास.  ( लग्नानंतरच्या इतक्या वर्षाने देखील ??? )


पायी पायी खाली उतरतांना तर !!





इंद्रदेवते



हे इंद्रदेवते
तु आपल्या वज्राने
मेघांवर प्रहार कर.

हे इंद्रदेवते
पर्जन्याने सुखावलेली धरती
आम्हास भरभरुन अन्नधान्य देवो