Friday, April 27, 2007

श्री. राहुल देशपांडे- दादा ते आले ते गायले आणि त्यांनी मन जिंकले


चारपाच वर्षापुर्वीची गोष्ट, इंदौरात दिपावलीत, पाडव्याच्या भल्यापहाटे आम्ही समस्त मराठी समाज, नववर्षाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी रवींन्द्र नाट्यगृहात जमलो होतो. प्रयोजन होते, स्वानंद आयोजीत तरुण, प्रतिभाशाली गायक श्री. राहुल देशपांडेचा नाट्यसंगीतावर आधारीत कार्यक्रम. पडदा उघडण्याआधी, पडद्याआड जुन्याकाळाच्या प्रथेनुसार नांदी सुरु झाली. प. वसंतराव देशपांडेंची कैसट लावली होती. हळूहळू पडदा उघडू लागला, सर्वजण आर्श्चयचकीत होवुन रंगमंचावरील तो अविष्कार मंत्रमुघ्ध अवस्थेत ऐकत भावनावश होत होते. श्री. राहुल देशपांडे नांदी गात होते. ते आले त्यांनी गायला सुरवात केली आणि त्यांनी जिंकले, इंदौर काबीज केले. टाळ्याच्या गजरात त्यांना दाद देणे सुरु झाले. वा, वा, बढिया, क्या बात है? पहिल्याच दर्शनाने रसीक नादवला, खुळवला, श्री. राहुल देशपांडेच्या प्रेमात पडला. नांदीनंतर श्री. राहुल देशपांडेनी जवळजवळ तीन, चार का पाच ? देव जाणे, येथे वेळेचे भान होते कोणाला ? (फक्त्त मध्यांतरात पोह्याचा बेत होत त्यापुरतेच आम्ही होशोहवासात होतो) (या होशोहवास शब्दावरुन "युं खुदाके लिये छीनो ना मेरे होशोहवास । ऐसे नज़रोसे ना देखो खु़मार आ जाये ॥ - नुरज़हान), सुरवातीच्या काळापासुन अगदी अलीकडच्या काळातील नाट्यगीते ऐकवली. तेथे सर्व वर्तमानपत्रानी त्यांना कार्यक्रमाआधी व नंतर अगदी डोक्यावर घेतले होते, भरभरुन राहुलजींवर लेख लिहिले जात होते ? ( आपल्या मुंवई, पुण्यात ही गोष्ट मोठी दुर्मीळ ) . जोहर मायबाप जोहार.
ह्या कार्यक्रमाआधी आदल्या दिवशी संध्याकाळी ते डॉ. शशीकांत तांबे यांच्या घरी गाणार असल्याचे वर्तमानपत्रात वाचुन मी डॉ. तांबेच्या घरी पण गेलो होतो. पण काही कारणास्तव श्री. राहुल देशपांडेचे ते गाणे रद्द झाले. ( मुख्य कार्यक्रमापुर्वी ते कसे दुसरीकडे गाणार ? आयोजन करणाऱ्यांना हे समजायला हवे होते, मग डॉ. तांबेच गायले) . त्या नंतर मी श्री. राहुल देशपांडेचा मुबंईतील कार्यक्रम सहसा चुकवत नाही. दोन वर्षापुर्वी श्री. राहुल देशपांडेचा लोकमान्य सभाग्रुह, विलेपार्ले, येथे शास्त्रीय संगीताचा झालेला कार्यक्रमपण मला चांगलाच आठवतो.
हे सारे आज आठवण्याचे कारण काय तर आज बस मधुन जाताना मी अचानक पं. वसंतराव देशपांडेचे नाव लिहीलेला फलक वाचला. तो वाचण्यासाठी बस मधुन उतरुन पहीले तर काय उद्या रात्री साडेआठ वाजता साहित्य संघात श्री. राहुल देशपांडेचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आहे. मला जायलाच हवे.
ह्या तुलनेवरुन.
मध्यंतरी मी मुकुल शिवपुत्र यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हा ते " माझ्या सुरवातीला माझे गाणे ऐकल्यानंतर लोक, आम्हाला पं. कुमारजी गंधर्वांची आठवण झाली हे सांगायचे, मग मला ह्या तुलनेचा राग यायचा ,पण आज मलाच माझ्या वडीलांची खुप आठवण येत आहे " अश्या अर्थाचे काहीतरी म्हणाले. त्याच्या स्वरात विशाद होता का ? देव जाणे. खरच ही तुलना कीती अयोग्य असते.
हरीवंशराय बच्चनची एक सुंदर कविता आहे. महान वृक्ष आपल्या खाली वाढणाच्या झाडाझुडपांना बघुन म्हणातो की ही माझ्या छ्त्रछायेत ही किती सुखी आहेत. उन, पावसाचा मारा मी झेलतो, यांना कसलीच तोशीश लागुन देत नाही. झाडेझुडपे म्हणतात हा वृक्ष एकटाच खुप मोठा झाला आहे, वाढ्ला आहे, आणि ह्याने तर आमची वाढ खुंटुन टाकली आहे.
श्री. राहुल देशपांडेंवर श्री, तात्या अभ्यंकरनी त्यांच्या ब्लॉगवर अप्रतिम लेख लिहीलेला आहे.

No comments: