Sunday, September 10, 2006

Bhatkanti

Courtsy : http://www.esakal.com/
कोंडाणा लेणी - कर्जतहून कोंडाणा गावापर्यंतचे अंतर १०- १२ किलोमीटर आहे. गावामागच्या डोंगरमाथ्यावर राजमाची किल्ला आहे. याच डोंगराच्या पोटात कोंडाणा लेणी आहेत. लेण्यांमध्ये एक मुख्य चैत्यगृह व शेजारी काही भिक्‍खूंच्या प्रार्थनेच्या खोल्या आहेत.
कर्नाळा - मुंबई- गोवा महामार्गावर पनवेलपासून १० कि.मी. अंतरावर कर्नाळा किल्ला आहे. महाराष्ट्र शासनाने कर्नाळ्याचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. तेथे पक्षी संग्राहलय आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी कातळात कोरलेल्या अरुंद पायऱ्या आहेत. दरवाजातून आत ७०-८० फूट उंच सुळका स्वागत करतो.
लोहगड - लोणावळ्याची प्रचंड गर्दी टाळून जाण्यासाठी योग्य जागा म्हणजे लोहगड. सकाळी लोकल पकडून मळवली स्टेशनात उतरल्यावर एक्‍स्प्रेसवे पार करून भाजे गाव गाठायचे. लांब-रुंद पायऱ्या असणाऱ्या झकास वाटेने गडाचा माथा येतो. चार वाजेपर्यंत भाजे गावात उतरलात, तर समोरच्या कड्यात अर्ध्या अंतरावर भाजे लेणी पाहता येतात.
गोरखगड - ठाणे जिल्ह्यातील मुरबाडजवळील देहरी येथील गोरखगड हा खास करून पावसाळ्यातील निसर्ग अनुभवण्याजोगा किल्ला आहे. कल्याणपासून तीस किलोमीटरवर मुरबाड व पुढे २५ किलोमीटरवर देहरी असे अंतर आहे. गोरखगडाच्या सुळक्‍याच्या पायथ्यात कोरलेली गुहा लागते. गुहेच्या शेजारी छोटे मंदिर आहे. माथ्यावर शंकराची पिंड असलेले हल्लीच बांधलेले एक देऊळ आहे.
पेब (बिकटगड) - मुंबईपासून सर्वांत जवळचा गड म्हणजे पेब गड. पेब गडावर जायचे असल्यास मालडुंगे गावासमोरील सत्याची वाडीवरून जाता येते. माळडुंगेपासून साधारण तासभर चालल्यावर हळूहळू चढ लागतो तो थेट पेब गडाच्या मधल्या भागात सरळ कड्याजवळ येतो.
पेठ (कोथळीगड) - कर्जतजवळील बऱ्यापैकी सोपा ट्रेक म्हणजे पेठ किल्ला. कर्जतहून जामरूखची एसटी पकडून आंबिवली येथे उतरावे. आंबिवलीकडून धावणीला जाणाऱ्या रस्त्याने पाऊणतासात पेठ गावाचे पठार येते. तेथून चढणीची मळलेली वाट पकडून गडावर साधारण पाऊण तासात पोचता येते. गुहेत नक्षीकाम केलेले पाच खांब आहेत व भैरोबाचे देऊळ आहे. तेथून पदरगड, सिद्धगड व भीमाशंकर पर्वतरांगा दिसतात.
प्रबळगड - मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईपासून सुमारे ४५ किलेमीटरवर शेडूंग फाटा येथे एसटी बसने किंवा पनवेल वारपोली बसने वारपोली गावात पोचायचे. वारपोली गावातून सरळ कच्चा रस्ता व पुढे पाऊलवाटेने (साधारण १५ मिनिटे) ठाकूरवाडीत जायचे. या वाटेवरून ईशा व गडाकडे तसेच माथेरानला आरकसवाडीमार्गे जाण्यासाठी वाट आहे.
हरिश्‍चंद्र गड - हरिश्‍चंद्र गडावर जाण्यासाठी कल्याणहून माळशेज घाटातून पुढे जुन्नरला जाणारी सकाळची एसटी आहे. खुबी फाट्यावर उतरायचे. येथून तासाभरात खिरेश्‍वर गाव येते. गडावरील कोकणकडा हा सर्वांच्याच आवडीचे ठिकाण. वाटेतील गुहेत मध्यभागी एक भले मोठे शिवलिंग आहे. त्याच्या सर्व बाजूंनी बर्फासारखे थंडगार पाणी आहे. बरेच जण या पिंडीला प्रदक्षिणा घालतात.
त्रिंगाळवाडी - त्रिंगाळवाडीला जाण्यासाठी मुंबईहून सकाळची तपोवन एक्‍स्प्रेस पकडून इगतपुरी गाठायचे. खिंडीमध्ये सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. खिंड पार करून सुमारे वीसेक मिनिटे चालल्यावर आपण त्रिंगळवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोचतो. नाक्‍यावरून उजवीकडे बुध्या डोंगर आणि समोर वाळविहीर डोंगर दिसतात. डावीकडे त्रिंगळवाडी किल्ला. किल्ल्याच्या पायथ्याशी लेणी आहेत.
चंदेरी - चंदेरी एक छोटेखानी टेहळणी किल्ला. पनवेलमार्गे इथे पोचता येते. पनवेल येथून धोदानी अगर मालडुंग या गावची एसटी पकडून चंदेरीला पोचता येते. येथून प्रबळगड, श्रीमलंग हेसुद्धा दिसतात. गावाबाहेरून जाणारे दोन विद्युत मनोरे मागे टाकले, की समोर लहान-मोठ्या टेकड्यांची रांग दिसते. माणिकगड - माणिकगड हा कर्नाळ्यानंतर सोपा ट्रेक आहे. पनवेल-वाशिवली एसटी बसने रसायनीमार्गे तासाभरात आपण येथे पोचतो. गाडीतून उजव्या बाजूला जो उंच डोंगर दिसतो तो माणिकगड. पश्‍चिम टोकाला असलेल्या सुळक्‍याला "माणिकची लिंगी' असे नाव आहे. नंतर गडाच्या दक्षिण टोकाकडे चालून परत उजवीकडे वळायचे आणि थेट सरळ वर चढून गडाच्या तुटक्‍या तटबंदीतून गडावर प्रवेश करायचा.
नाणेघाट - नाणेघाट गाठायचा, तर कल्याणला जावे लागते. इथल्या एसटी स्टॅंडवरून मुरबाडमार्गे माळशेज घाटात जाणारी गाडी पकडायची. मुरबाड सोडले, की वैशाखरे गावाच्या दोनेक किलोमीटरपुढे "ओतूर ६४ किलोमीटर' असा मैलाचा दगड दिसतो. येथून वर पाहिले, की नानाचा अंगठा म्हणजे एक मोठा कडा खुणावतो. शेवटचा नानाच्या अंगठ्याला लगटून असलेला घाट संपला, की दोन्ही बाजूंना छान गुहा लागतात. घाट चढून गेल्यावर लगेच पठार सुरू होते. इथे डावीकडे एक पडकी इमारत व समोर भला मोठा रांजण आढळतो. उजवीकडे खडकात कोरलेल्या लहान गुहेत श्रीगणेशाची मूर्ती दिसते. समोरच जीवधन किल्ला, वानरलिंगी, टोक सुळका व काट्याची लिंगी दिसतात.





No comments: