Thursday, July 05, 2007

राम नदी किनारे मेरो गाव सावरे आजय्यो, सावरे आजय्यो.

अहो फेकाडे भावोजी, ऐकले का ? आपल्या पुण्यात म्हणे राम नदी चक्क गिळकृत झाली, तिला म्हणे अनिर्बंध अतिक्रमणांची मगर "मिठी" बसली.

अग मीने, मीने , मीने, तु म्हणतेस तरी काय ? आता पर्यंत फक्त सरस्वती नदी लुप्त झाल्याचे वाचले होते, हा त्यातलाच प्रकार की काय ?

पण काय हो फेकाडे भावोजी, हे कसे काय झाले असावे हो ? काही कळत नाही.

अहो मीनावहीनी, गुप्तधनाची गंगा जमीनीखालुन वाहु लागली की कधी कधी होते असे. तिच्या प्रवाहात हा "नदीचा केलेला नाला" लोप पावतो, त्याचे स्वतंत्र अस्तीत्व नाहीसे होते, आता हे फारसे मनाला लावुन घेयचे नाही बर का. आता बघ, येथे माणसांनाच रहायला जागा नाही मग नदी, नाले, ओहोळ, आणि ओढे यांना जागा कुठुन मिळणार ? पावसाळ्यात होतो अधुन मधुन त्रास, मग जरासा आरडाओरडा होतो खरा, पण तो तेवढ्या पुरताच. सरस्वती लुप्त पावली तेव्हा कोणी काहीतरी बोंब मारल्याची आठवते काय ? आपण आपले वाचायचे व विसरुन जायचे.

मीने, तुला म्हणुन सांगतो, लोकांना बोंबाबोंब करायची सवयच लागली आहे. दर वर्षी काहीतरी नवे कारण लागते,. गेल्या वर्षी आठवते का ग तुला, "खड्डे रस्तात की खड्डात रस्ते" करत केवढे रान उठवले होते, आता यंदाला हा नवीन विषय "नदीत, ओढ्यावर, नाल्यावर अनधिकृत बांधकामे की बांधकामातुन पाण्याचे प्रवाह ? "

फेकाडे भावोजी खर आहे तुमचे बोलणे, बसा हं, तुमच्यासाठी गरमागरम कांद्याची खेकडा भजी करते, तो वर बोट येयीलच, तुम्हाला आमच्या सोसायटीतुन बाहेर सोडायला.

(पुर्वी आकाशवाणीवर एक श्रुतीका लागायची. टेकाडे भावजी, मीना वहीनी ही त्यातली प्रमुख पात्रे. इतर पात्रांची नावे कोणी मला सांगु शकेल का? )

सदर्भ -
सुनीत भावे - सकाळ वृत्तसेवा - रामनदी गिळंकृत!, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर"मिठी'
पुणे, ता. ३ - गेल्या काही वर्षांत पाषाण, बावधन, औंध परिसरातील अनिर्बंध बांधकामांनी रामनदीचा ४४ टक्के भाग "गिळंकृत' केल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली. .........
पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात "जिओ-अप्रेझल ऑफ रूरल- अर्बन इंटरफेस अलॉंग नॉर्थ-वेस्ट ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ः स्टडी बेस्ड्‌ ऑन जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम' या विषयावर संशोधन सुरू आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पुरस्कृत केलेल्या या संशोधनात, शहरात नव्याने समाविष्ट गावांमधील भू-पर्यावरणीय बदलांची नोंद घेण्यात येत आहे. त्यात रामनदीच्या ५१ चौरस किलोमीटर खोऱ्यातील विशेषतः शहराच्या हद्दीतील ४४ टक्के भाग अतिक्रमणांनी व्यापला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भुकूमजवळ वारपेवाडी येथे उगम पावणाऱ्या रामनदीची लांबी २० किलोमीटर आहे. समुद्रसपाटीपासून ५५० ते ८०० मीटर उंचीपर्यंत हे खोरे व्यापलेले असून, लहान-मोठे १८४ ओहोळ आणि सात ओढे नदीला येऊन मिळतात. मात्र, बेफाम शहरीकरणाच्या प्रक्रियेत या नदीच्या खोऱ्यामध्ये अनेक स्थित्यंतरे घडली. त्यात काही ओहोळांचे प्रवाह बंद करण्यात आले, तर काही उच्चभ्रू वस्तीच्या भागांत ओढ्यांची रुंदी घटली. या नदीची नोंद "नाला' म्हणून झाली असली, तरी सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रामनदीने पुन्हा अस्तित्व सिद्ध केलेच.

No comments: