Sunday, May 30, 2010

कल के कलाकार संगीत संमेलन - दिवस शेवटचा

मधले चार दिवस राजाभाऊ कल के कलाकार संगीत संमेलनामधुन अचानक गायब झाले होते, ते आज शेवटच्या दिवशी उगावले. वेळेवर संगणकावर Turn Off  वर उंदीराची टिचकी मारायला किंवा दिवसेंदिवस, रात्र रात्र घरातुन गायब राहिल्याबद्द्ल बायकोच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी एक जबरदस्त धैर्य अंगी असावयास लागते.   ते राजाभाऊंनी आणायचे कुठुन ?

आज शेवटच्या दिवशी त्यांनी एक गंमत केली, ते रंगमंचावर चाललेले भोपाळाच्या आमीर खानचे सरोद वादन सोडुन मागील खोलीत पोचले, तेथे मुंबईचे सोहम मुनीम सतारवादनाच्या कार्यक्रमाच्या आधी सराव करत होते ते ऐकण्यासाठी.  ते त्यांनी खुब ऐकले. मजा आली. हे खरे ऐकणॆ.

आज कार्यक्रमाची सुरवात अहमदाबाद  वरुन आलेल्या शिवानी पटेल यांनी गायलेल्या चंद्रकौस नी झाली. त्यानंतर बहार आणली ती नवी दिल्लीवरुन आलेल्या रंजन कुमार श्रीवास्तव यांनी व्हायोलीनवर वाजवलेल्या पुरीया कल्याणनी.

  राजाभाऊंनी मग मुंबईच्या आशिष साबळॆ यांनी गायलेला बिहाग ऐकला. त्यांच्या आधी एकजण बिहागडा गावुन गेले, पण त्यांचे नाव कळाले नाही. 

आज राजाभाऊंच्या बायकोने सुटकेचा निश्वास सोडला, आता उद्यापासुन आपल्या लहरी नवऱ्याचे पाय घराला वेळेवर लागतील या खोट्या आशेने.    

आज राजाभाऊंना एक गोष्ट प्रकर्षाने वाटु लागली ती म्हणजे बऱ्याच वेळा गातांना, आक्रमक गातांना, समोरच्याला बरे वाटावे म्हणुन गातांना, चढ्याने गातांना त्या बंदीशेचा मुळ आत्मा हरवुन जातो, त्या बंदिशीला, त्या रागाला  काय सांगायचे आहे, किती लडिवाळपणे,लाडात, प्रेमात, प्रेमीकांच्या प्रणयचेष्टा कश्या चालल्या आहेत हे उलगडुन सांगायचे असते. पण "पायलीया झनकारे मोरी " मधे नाजुक पायल निनादण्याऐवजी छनछन छनछन घुंगरु वाजत रहातात. .

लट उलझी सुलजा रे बालम ह्या बंदिशीचे , बिहागचे खरे सौंदर्य उलगडुन सांगितले ते तात्या अभ्यंकरांनी.  ती ऐकतांना हा तरुणाईचा प्रणय, ते नादावणॆ, खुळावणे, तो मोहणॆ, सारे सारे डोळ्यापुढे यायला हवे.




डफलीवाले डफली बजा


सरगम चित्रपटात जयाप्रदा नाचते आहे "डफलीवाले डफली बजा " च्या तालावर व ऋषी कपुर डफ वाजवतोय, प्रेक्षक डोलताहेत.

पण प्रत्यक्षात आयुष्य कठोर असते. फार. कठोर आणि कृर असते हे आयुष्य , उतारवयात तर ते आणखीन निष्ठुर होत रहाते, ह्या शरीराचा भार पेलवत रहाण्यासाठी ते माणसाला काहीही करावयास लावते.


Tuesday, May 25, 2010

कल के कलाकार संगीत संमेलन- दिवस पाचवा

येणारा प्रत्येक दिवस हा गेलेल्या दिवसापेक्षा अधिक चांगला, बहारदार का असतो ?  कधी वाटते की आता ह्याच्यापेक्षा जास्त चांगले काय असु शकेल पण तो समज लगेचच खोटा पाडला जातो.  गेले पाच दिवस या इथे जगाच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या तरुण कलावंतानी फार सुंदर,सुंदर, अप्रतिम नृत्य सादर केली. आज या संमेलनातील नृत्यसत्राची सांगता झाली आता उद्या पासुन कंठ व वाद्य संगीत.

आज एक अनोखा नृत्यप्रकार पहायला मिळाला, जो मुंबई-पुण्यामधे फार कमी बघायला मिळतो. इंफाळ वरुन आलेल्या सीनाम बसु सिंग यांनी सादर केलेले मणिपुरी नृत्य. हा कलाकार जबरदस्त ताकदीचा आहे. याचे आपल्याकडॆ आणखीन कार्यक्रम व्हायला हवेत.

आज सुरवातीला अलाहाबाद वरुन आलेल्या पुर्णिमा श्रीवास्तव यांनी केलेले कथ्थक पाहुनच हा दिवस फार बहारदार असणार हे जाणवले होते.  त्यांच्या नंतर मणिपुरी व परत कथ्थक , मुंबईच्या निशी सिंग यांचे.

या कार्यक्रमाची सुरवात कोलकाताच्या अनुपा लहरी यांच्या चित्तवेधक भरतनाट्यमनी झाली होती, ज्याची सुरवातच एवढी जबरदस्त मग त्याच्य शेवटाही तसाच भारदस्त, उत्तम, सर्वोत्तम , सर्वश्रेष्ट व्हायला हवा, हे काम केले ते मुंबईच्या ग्रीश्मा लेले यांच्य भरतनाट्यमनी.

हे सारे कधीच संपु नये असे वाटत होते, पण चांगल्या गोष्टी नेहमीच लवकर संपतात,  त्याच्या सुखद आठवणी मनात रेंगाळत ठेवत.



ता.क. हे फोटो बघता वाटते नवा कॅमेरा घेण्याची वेळ आली आहे.

कल के कलाकार संगीत संमेलन - दिवस चवथा.


असाधारण, अतिशय उत्तम, अ स्टेलर परफॉर्मन्स, ( राजाभाऊंनी सा. सकाळ मधल एन.डी.आपटे यांचा लेख वाचलेला दिसतोय.) असे ज्याचे वर्णन करावेसे वाटते असे तिन कार्यक्रम आज या "कल के कलाकार संगीत संमेलन " मधे चवथ्या दिवशी झाले.

या तिनामधल्या दोघांचे राजाभाऊ साक्षीदार होते, भानुशाली वरुन आलेल्या डॉ.भावना ग्रोव्हर यांचा , कथ्थकचा व दुसरा देखील कथ्थकचा , मुंबईच्या उर्मीला कानेटकरांचा, ज्यांना बहुसंख्य टी.व्ही वर मालिकेत , अनेक मालिकेत बघतात अश्या त्या उर्मिला कानेटकरांचा व एक असा कार्यक्रम , कुचीपुडी नृत्याचा, आदर्शवत किचीपुडीचा, टॆक्सास वरुन आलेल्या प्राणम्या सुरींचा जो राजाभाऊ पोचेपोचेपर्यंत संपुन गेला होता, व ज्या कार्यक्रमाबद्द्ल त्यांच्या जखमेवर मिठ चोळत इतरांने त्याचे भरभरुन वर्णन केले तो.



चैत्राली सेनगुप्ता व हर्षली कर्वे, मुंबई यांनी सादर केलेले भरतनाट्यम बघुन राजाभाऊ निघाले.

त्या आधी कावीळ झालेली असुन सुद्धा केवळ कलेपायी कोलकता वरुन , ओडीशी सादर करायला आलेल्या श्योमिता दासगुप्ता, परत तेथुनच आलेल्या सुपर्णा राव यांचे भरत नाट्यम चेन्नाई वरुन आलेले किरण राजगोपालन यांचे भरत नाट्यम, मुंबईचे रुपक मेहता यांनी केलेले भरतनाट्यम आदी कार्यक्रम झाले.


Sunday, May 23, 2010

कल के कलाकार संमेलन - दिवस तिसरा


आज राजाभाऊंना वेध लागले होते ते द.कोरीयाच्या कीम जियॉंग ही सादर करणार असलेल्या कथ्थकचे. हो. कथ्थकचे, द. कोरीयाची किम. भारतात राहुन राहिलेली कथ्थक शिकण्याचा ध्यास घेतलेली कीम.




आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरवात कोलकता वरुन आलेल्या कौस्तुवी सरकार व पोंपी पाल यांनी केलेल्या ओडीशी नृत्याने.




आजचा दिवस अधिक सुंदर होता, म्हैसुर वरुन आलेल्या अपर्णा व राधिका अय्यंगर यांनी मग दृष्ट लागेल असे भरतनाट्यम सादर केले.




तिसरा कार्यक्रम होता कीम जियॉंगचा. कथ्थकचा. एक परदेशी तरुणी आपले भारतातील नृत्याचा प्रकार करते हे पहाणे. हे किती काहीतरी वेगळे वाटत होते.

मग मुंबईच्या कृपा पाबरी यांचे ओडीशी नृत्य पाहुन राजाभाऊ , थकलेले राजाभाऊ लवकर निघाले, अंगात जास्त त्राण नव्हते राहिले. हे ऐवढे कार्यक्रम सलगपणे पहाणॆ.



आज बंगळुरु वरुन आलेल्या श्रेया अयुब व पंखुरी अगरवाल यांचे मणीपुरी नृत्य मात्र पहायचे राहुन गेले याची फार चुटपुट लागुन राहिली आहे.

जर राजाभाऊ परीक्षक असते तर मात्र त्यांची मोठी पंचाईत झाली असती. ठरवायचे कसे कोणाला काय द्यायचे ते, सारेच बावनकशी सोने, डावे उजवे करावे कसे आणि का ?


कुंजलता मिश्रा -बृदाबन

अपर्णा माने व श्वेता पडवळ

पण का ?

जेव्हा जेव्हा आपल्याला दोन चार दिवसापुर्वीचे वर्तमानपत्र काही संदर्भासाठी हवे असते तेव्हा त्याच वेळी नेमकी आपल्या बायकोने रद्दीवाल्याला सर्व रद्दी दिलेली असते.


याच साठी केला होता का अट्टाहास ?

कमनशिबी मुंबईकर -

 केवळ आयोजकांची वर्तमानपत्रात जाहिराती किंवा प्रेस रिलीज देण्याची इच्छा नसल्यामुळे. 

आयोजक ह्या संमेलनासाठी प्रचंड, महाप्रचंड, अविरत, वर्षभर कठीण परिश्रम, घोर मेहनत घेतात , पण जर ती मेहनत लोकांपर्यंत पोचत नसेल तर, जर शेकडो मैलाचा प्रवास करुन आलेल्या कलावंताला दाद देण्यासाठी कोणीच नसेल तर ..



गेल्या वर्षी मुंबई दुरदर्शनच्या प्रमुखांनी याला कव्हरेज देण्यासाठी, हे सारे दुरदर्शनवर सादर करण्यासाठी आपली इच्छा जाहिर केली, पण अत्यंत वाईटरित्या त्यांना नकार दिला गेला.
भव्यदिव्य इतिहास आणि परंपर व त्यात आम्ही रमलेलो, 

कल के कलाकार संगीत संमेलन- दिवस दुसरा - एक अविस्मरणीय दिवस.

"माझ्या मुळे काय काय होते त्याची एक लिस्ट करुन ठेव. "

संतापलेल्या राजाभाऊंच्या बायकोने रागाने विचारले.

" आयुष्यभर तेच तेच ऐकुन कंटाळा आलाय मला" ती पुढे म्हणाली. "जेवणं पण करा, तुझ्याबरोबर फिरायला पण चला "

"अग पण, मी काय म्हटलंय का ? मी फक्‍त बोललो, उशीर होतोय, ओडीशी सुरु झालं असेल "

धोरणी राजाभाऊंनी शरणांगती पत्करली. उगीच घुंगरांच्या जागी नुपुर पहाण्याची वेळ न येवो. (संतापलेल्या तिने लत्ताप्रहार करावा व प्रियकराने तो आपल्या हृदयी किंवा मस्तकी धारण करावा असा हा संस्कॄत कादबऱ्यांमधला संकेत )

मनधरणीनी मग ती पाघळली आणि  ते स्थळी वेळेवर पोचले एकापेक्षा एक सरस असे एकंदरीत आठ नॄत्याचे कार्यक्रमाचा आनंद लुटायला, कल के कलाकार संमेलनाला दुसऱ्या दिवशी.

या तरुण आणि प्रचंड गुणी कलवंतांनी केलेला प्रत्येक कार्यक्रम पहाताना वाटतं , आता यापेक्षा अधिक सरस काय ते असु शकेल ? पण तो समज लगेचच खोटा ठरतो, एकापेक्षा एक , तोडीस तोड, निव्वळ अप्रतिम, उत्कृष्ट कार्यक्रम या येथे पहायला मिळतात, आणि ते सादर कोण करतात तर पार अमेरीका, पश्चिम बंगाल, वृदांवन, जगाच्या कानाकोपऱ्यातुन आलेले , उद्या होणारा सोनेरी इतिहास आत्ता ह्या क्षणी येथे रचतांना दिसणारे तरुण. खऱ्या कलेचा आस्वाद लुटायचा असेल तर येथे या संमेलनाला यायला हवे.

काल

दिपाली जीना आणि कल्याणी साहु - ओडीशी - भुबनेश्वर
रुचीका गुप्ता - भरत नाट्यम - नवी दिल्ली
सुनयना राव - कथ्थक - टेक्सास - अमेरीका,
दिपीका पोटारजु - व्हर्जीनेया - अमेरीका - कुचीपुडी
जानकी रंगरजन - चेन्नाई - भरत नाट्यम
श्रीपमा चक्रबोरटी - कथ्थक - चंद्रपुर
कुंजलता मिश्रा - ओडीशी - बृंदाबन
अपर्णा माने आणि श्वेता पडवळ - कथ्थक - मुंबई

Saturday, May 22, 2010

भिजकी वही

राजाभाऊंचे पुढचे काही दिवस,
दिवसच बदलुन जाणार आहेत
अरुण कोलटकर जे वाचायला घेतलयं.

कधी चालताचालता, ट्रेनमधल्या गर्दीत बसल्याबसल्या,
उभ्याउभ्याने आपला तोल सावरत आणि इतरांचे धक्क्के सहन करीत,
झपाटुन जायचय
भिजल्या वहीचा लगदा करत.

मॅनहोलमधला माणुस वाचतांना त्यातला अरुण कोलटकरंची भेट झाली, वाचावेसे वाटले.
आज अचानक ध्यानीमनी नसता वाचनालयात समोर कोणीतरी कोलटकरांची एक नव्हे, दोन नव्हे चक्क चार पुस्तके परत केली.

मग काय "भिजकी वही" वाचतोय.

हे दिवस मोठे कठीण होत जाणार आहेत.

कोलटकर आणि त्या सोबत जीएचं "सोनपावले" .


दोघांना पेलवणॆ महाकठीण,

अरेच्चा

अरेच्चा, आपल्या मुलाला गप्पापण मारता येतात ?

हे बापाला कळते जेव्हा तो हे जाणुन घेतो.

Friday, May 21, 2010

कल के कलाकार - दिवस पहिला

सुर सिंगार सांसद आयोजीत"कल के कलाकार" नामक संगीत संमेलन मुंबई मधे आज सुरु झाले.


 
आजचा मुहुर्ताच्या दिवशी एकापेक्षा एक सरस कार्यक्रम झाले, सर्वात जास्त आवडले ते त्रिचुर वरुन आलेल्या श्रीलक्श्मी गोवर्धनन यांनी केलेले कुचीपुडी नृत्य.




त्याआधी खास मलेशियावरुन आलेल्या दासग्ना रानी विजयकुमार यांनी आपल्या ओडीशी नृत्याने सर्वांचे मन जिंकुन घेतलेले.





शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम आणि त्यात पुण्याच्या मुली कथ्थक सादर करायला नाहीत असे कधी झालय का ? शितल कपोले आणि अमिरा पाटणकर यांचे कथ्थक, मग काय राजाभाऊ खुश.




या संमेलनची सुरवात कोलकोता वरुन आलेल्या अरुपा लहीरी यांच्या भरतनाट्यमनी झाली.

आज संमेलनची सुरवात मोठ्‍या झोकात जालेली आहे. ज्याची सुरवातच एवढी मस्त ते संमेलन आता पुढील दिवसात किती छान रंगत जाईल.


मुंबईच्या कृष्णा नायक यांच्या मोहिनी अट्ट्म पाहुन मग राजाभाऊ आणि त्यांची बायको निघाले.



पुढील दहा दिवस राजाभाऊंचा मुक्काम पोष्ट मुंबई विद्यापिठ विद्यार्थी भवन, बी रोड, चर्चगेट.

Wednesday, May 19, 2010

गर्द निळा गगन झुला. - कौशल इनामदार

गर्द निळा गगन झुला,शब्द-सुरांचा अनोखा संगम
कवी : अशोक बागवे
संगीतकार - कौशल इनामदार

"आज मराठी गाण्याला येणार काय ? " राजाभाऊंनी आपल्या बायकोला विचारले.

तिने नकार दिला.

"तु काही वेळेवर ऑफिसमधुन निघत नाहीस. तुला पाहिजे तर तु जा "

तिला कुठे ठावुक होते "कौशल इनामदार " या शब्दाच्या मोहिनी मुळॆ राजाभाऊ आज बरोबर पावणॆ सहा वाजता निघुन कसरत करत चकाल्यावरुन चव्हाण सेंटरला बरोबर कार्यक्रमाच्या वेळी पोचणार आहेत.

तसेच तेथे पोचेपर्यंत राजाभाऊंना ठावुक नव्हते की हा कार्यक्रम स्वःत कौशल व त्यांचे सहधर्मी करणार आहेत ते. त्यांची बायको दुर्दैवी व राजभाऊ सुदैवी म्हणायला पाहिजेत. आज त्यांच्यासाठी एक नवे विश्व, नवे भांडार खुले झाले.

बहार आली. सारे काही नव्याने उलगडत गेले. संगीतकार, गायक , अर्थ अलगद उमजुन सांगणारे, कवितेचे लाघवीपण दाखवुन देणारे, त्यातले मर्म समोर ठेवणारे, गाण्याच्या चाली मधले सौदर्य समोर आणणारे कौशल इनामदार, सोबत निवेदन करणारे कवी अशोक बागवे, बरोबर त्यांचे सहधर्मी कलावंत.

खरं म्हणजे त्यांच्या बायकोला सुदैवी म्हणायला पाहिजे. जी या कार्यक्रमाला आली नाही. 

राजाभाऊंच्या मनात जसे भिनलेले हे शब्द-सुरांचे जहर ,त्यांनी आलेली ही अस्वस्थता, कौशल इनामदार पुन्हा एकदा जाणुन घेण्यापुर्वीची बैचेनी , या साऱ्या भावभावनांपासुन ती न आल्यामुळे लांब राहिली गेली.